आटपाडी -- भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आटपाडी नगरपंचायतीला भेट देऊन जन्म-मृत्यू नोंदींचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः बांगलादेशी नागरिकांनी बेकायदेशीररीत्या या नोंदी केल्या आहेत का, याची त्यांनी मुख्यधिकाऱ्यांकडे चौकशी केली. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या महिनाभराच्या कालावधीत आटपाडी नगरपंचायतीत २,००० हून अधिक जन्म मृत्यूच्या ऑनलाइन नोंदी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे, ज्या वास्तविक जुन्या काळातील आहेत.
त्यामुळे अचानक नोंदी झाल्यामुळे सोमय्या यांनी मुख्याधिकारी वैभव हजारे यांची भेट घेऊन या सर्व नोंदींची सखोल माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात झालेल्या मोठ्या 'बोगस प्रमाणपत्र घोटाळ्या'वर भाष्य केले. सोमय्या म्हणाले की,यापूर्वी महाराष्ट्रात ३ लाख बांगलादेशी नागरिकांनी बोगस नोंदी करून रहिवासी प्रमाणपत्रे मिळवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा उघडकीस आणून ती सर्व प्रमाणपत्रे रद्द केली होती. आटपाडी नगरपंचायतीच्या कामकाजातही या संदर्भात अधिक पारदर्शकता आणि सुधारणा करण्याची गरज आहे. तशा संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिली आहेत."
या भवेळी नगराध्यक्ष यु.टी. जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, नगरसेवक ऋषिकेश देशमुख, अजित जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने अशा संशयास्पद नोंदींबाबत सतर्क राहावे, अशी सूचनाही सोमय्या यांनी यावेळी केली.
إرسال تعليق