सांगली:सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सत्तास्थापनेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अध्यक्षपदासाठी आज शिवसेनेच्या (शिंदे गट) शितल बाबर, भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नाली मासाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संगीता पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले आहेत. शेवटच्या क्षणी भाजपाने शिवसेनेची उमेदवारी दाखल करून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडीत गाठले आहे.
महाविकास आघाडीकडून संगीता पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीतून त्यांनी एकमेव उमेदवारी अर्ज घेतले आहेत. महाविकास आघाडीने एकजूट दाखवत आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने त्यांच्या गोटात सध्या तरी स्पष्टता दिसत आहे.
दुसरीकडे, महायुतीतून शेवटच्या क्षणापर्यंत खलबतं सुरू आहेत. भाजपने शिवसेनेच्या शितल बाबर यांचा अर्ज भरण्यासाठी आग्रह धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, स्वप्नाली मासाळ यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुती नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार गटाची भूमिका ठरणार निर्णायक
या संपूर्ण निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अजित पवार गट नक्की कोणाला साथ देणार, यावर सत्तेचे पारडे फिरू शकते. ते भाजपाला साथ देणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाने शिवसेनेच्या शितल बाबर यांचे नाव पुढे आणले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
Post a Comment