आटपाडी ता.27- बनपुरी येथे चोरीच्या संशयावरून पोटच्या दोन मुलींचे हातपाय बांधून रात्रभर तुळईला लटकवून ठेवल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेतील नराधम पिता नाना यमगर आणि निष्ठुर आईला कठोर कायदेशीर कारवाई करून 'फाशी'चीच शिक्षा द्यावी, अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केवळ चोरीच्या संशयावरून ९ आणि ११ वर्षांच्या दोन निष्पाप मुलींचे हातपाय बांधून त्यांना अमानुषपणे छळणे, ही केवळ गुन्हेगारी नसून माणुसकीचा अंत केला आहे. ज्या पालकांनी मुलांचे रक्षण करायला हवे, तेच भक्षक बनले आहेत. या क्रूरतेमुळे ९ वर्षांच्या ऋतुजाचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असून दुसरी मुलगी अनुजा अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे. यावेळी राजेंद्र खरात यांनी समाजाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "हा प्रकार घडत असताना आसपासचे लोक, नातेवाईक आणि समाज गप्प का होता? असा सवाल केला आहे.आरपीआयने या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही खरात यांनी दिला आहे.
Post a Comment