आटपाडी ता. 7 : शहरातील टपरीधारकांना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अतिक्रमण नोटिसांवरून शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रशासनाने साडेचारशे अतिक्रमणे असताना ठराविक टपरीधारकांनाच लक्ष्य केल्याने गटनेते अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी प्रशासकीय यंत्रणेला जोरदार धारेवर धरले. "नगरपंचायतीचा न्याय सर्वांसाठी समान असावा, कोणावरही अन्याय झाला तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल," असा इशारा देत त्यांनी तहसीलदार आणि पोलिस प्रशासनाला निवेदन दिले.शहरातील ओढापात्र, रिंग रोड, बाजार पटांगण आणि बायपास रोड परिसरात साडेचारशेहून अधिक छोटे-मोठे व्यावसायिक टपऱ्या टाकून उदरनिर्वाह करतात. मात्र, प्रशासनाकडून सर्वांना नोटीस न देता केवळ विशिष्ट टपरीधारकांनाच टार्गेट केले आहे. हा प्रकार लोकशाहीला धरून नसून अत्यंत अन्यायकारक असल्याची भूमिका अमरसिंह पाटील यांनी मांडली. गेल्या वर्षीही ४०० ते ४६२ नोटिसा बजावून केवळ कागदी घोडे नाचवले. कारवाई करायचीच असेल तर ती सरसकट सर्वांवर करा, अन्यथा कोणालाही हात लावू नका," अशा आक्रमक पवित्र्यात पाटील यांनी घेतला. कारवाई करण्यापूर्वी या गरिबांच्या व्यवसायाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी केली.आटपाडी ओढापात्र परिसरातील बायपास रस्त्यावर वाढलेली वर्दळ पाहता, तेथे तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.यावेळी सौ. संध्या पाटील, बाळासाहेब हजारे,शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
साडेचारशे अतिक्रमणे असताना काहीनाच नोटिसा का?, सर्वांना समान न्याय देण्याची शिवसेनेची मागणी
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment