आटपाडी: : कौठूळी ता. आटपाडी येथील गावच्या हक्काच्या मुख्य गायराण जमिनीवर सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी विजय कदम व त्यांच्या कुटुंबाने आटपाडी तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन गायरान जमिनीवरील भूमाफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
कौठूळीत ग्रामपंचायत हद्दीतील श्री. हनुमान मंदिर परिसरातील मुख्य गायराण जमिनीवर सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. ही जमीन जनावरांच्या चराईसाठी आणि सार्वजनिक वापरासाठी आरक्षित असतानाही, तिथे खाजगी व्यक्तींकडून पक्की बांधकामे केली जात आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाला याची माहिती देऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने कदम कुटुंबाने उपोषणाचे हत्यार उपसले आहे.विजय कदम यांच्या म्हणण्यानुसार, कौठुळीत ग्रामपंचायत आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे या अतिक्रमणाबाबत पुरावे दिले आहेत. मात्र, लोकसेवकांच्या मनमानी कारभारामुळे आणि अर्थपूर्ण संबंधांमुळे या बांधकामांना अभय मिळत आहे. जोपर्यंत गायराण जमिनीवरील हे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश मिळत नाहीत आणि संबंधित भूमाफियांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
Post a Comment